नुकताच मी

नुकताच मी
नदीवर जाऊन आलो
डोळ्यात साठलेलं एक तळं
अगदी थेंब थेंब पिळून आलो
वेळ होती ती किर्र रात्रीची
तरी नदीला भरती आली
तिलाच कळले नाही
कोणाची वेदना वरती आली
बांध तोडून काठाचा
ती गावभर फिरू लागली
माझा शोध घेण्यासाठी
हरेक घरात शिरू लागली
तिला ही पहायचं होत
कोणाच इतक दु:खी घर होत
मीही नित्य मिसळते सागराशी
पण कुठे त्याची पातळी वर येते
माझ्या घरापाशी ती येताच
एक थेंब माझ्या डोळ्यातून गळाला
मी वाहिलेल्या तळयातील अवशेषांशी
माझा गळलेला थेंब जुळाला
ओळखलं तिने मला
जागच्या जागी ती स्तब्ध झाली
नजर माझ्याशी मिळताचं
स्व:तास म्हणू लागली अभागी
म्हणाली,
आजवर माझा समज होता
जगातली सर्वात दु:खी मीच आहे
पण, तुझ्याशी मापल्यावर कळलं
माझे दु:ख किती कमीच आहे
रोज स्वत:स बुडवते सागरात
पण कधी कुठे फरक पडला
तू एकदाच दु:ख जाहीर केलसं
माझ्या अंत:करणातून पूर आला
मी म्हणालो.....
आपल्याहून सुखी जणांकडे पाहीलं
की आपणास आपण दु:खी वाटतो
आपल्याहून दु:खी जणांकडे पाहण्याचा
आपण प्रयत्नच कुठे करतो
जोपर्यंत ही वृत्ती बदलत नाही
तोपर्यंत हे असचं चालणार
सुख-समाधानात नांदणाराही
मी दु:खी आहे असचं बोलणार

1 comment:

कोहम said...

wah...chaan kavita...avadali..