मी विचार करतोय

आई मी विचार करतोय जन्म घेऊ कि नको याचा ,
विचार करतोय या दुनियात पाऊल ठेवू का नको याचा

बघ ना इथे किती शांत,
बघ ना इथे किती निवांत,
इथे ना कुणाची कटकट,ना कुणाची किटकिट
आणि बाहेर बघ....सगळ्यांची नुसती चिडचिड.

इथून बाहेर आलो ना कि,
माझ्या इवल्याश्या जीवाकडेही तुम्ही खूप काही मागणार,
"डॉक्टर-इंजिनिअर व्हायचं हा बाळा" असेही सांगणार,
आल्या आल्या मी तुमच्या इतक्या अपेक्षा कश्या झेलू?
छोटुसा मी.....तुमच्या मागण्या ऐकू कि खेळण्यांनी खेळू?

मी थोडासा मोठा झालो कि पाठीवर दप्तर येणार,
कारण डोनेशन देऊन तुम्ही शाळेत मला आडमिशन घेणार,
हल्ली म्हणे मुलांपेक्षा त्यांच्या दप्तराचं वजन जास्त असतं,
मीही मग इतर मुलांसारखा पाठीवर दप्तर घेऊन गाढव होणार.

अजून थोडा मोठा झालो कि,कॉलेज सुरु होणार,
लपवून लपवून मग मीही कधीतरी डिस्कोला जाणार,
कुणी चुगली केली तर घरी येऊन तुमचा मार खाणार,
माझ्याही डोळ्यासमोर कधी तरी "तिचा" चेहरा येणार,
तीही कधी तरी अशी अलगत मला मिठीत घेणार,
पण ती निघून गेली कि मी "देवदास" होणार.

कधी महागाई तर कधी दंगली भडकणार,
मीही सामान्य माणूस....नेमका मीच त्यात अडकणार.
नोकरी लागावी म्हणून मी उन्हात फिरणार,
शेवटी लाच देऊनच कुठेतरी नोकरी मिळवणार,
लाच देऊन नोकरी मिळवली म्हणून मी पण मग लाच घेणार.

एखादी सुंदर मुलगी बघून लग्न करणार,
तिच्या गरजा जास्त....मग अजून लाच घेणार,
आमच्याही घरात नंतर कधी तरी पाळणा हलणार,
इवलासा जीव आमच्याही घरात मग पाउल ठेवणार......
मग पुन्हा सगळं हेच चक्र सुरु होणार.....

आई म्हणूनच....मी विचार करतोय जन्म घेऊ कि नको याचा ,
विचार करतोय या दुनियात पाऊल ठेवू का नको याचा.

आई म्हणाली,
"बाळा,परिस्थितीने बदलण्यात नसतो रे पुरुषार्थ,
परिस्थिती बदलतो ना....तोच खरा पुरुषार्थ"
-अनामिक

No comments: