तुझा निरोप घेऊन
तीनदा 'येतो गं' म्हणून
जड पावलांनी मी निघालो
हळूच माझ्या मागे येऊन
खांद्यावर हात ठेऊन म्हणालीस...
"मी आहे!"
पाठ वळताच भयाण पोकळी जाणवू लागली
तुझ्याविना जगाची तसवीर मला भिववू लागली
जलतरंगाचा नाद व्हावा असा तुझा आवाज
पुन्हा कधी ऐकायला मिळेल
असं वाटू लागलं, तेव्हा
फोन आलाच तुझा, म्हणालीस...
"मी आहे!"
घरी आलो, अगतिकपणे बसलो खिडकीत
गाडी सुटली असेल का तुझी, असा खिन्न विचार करत
श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ चालला होता बाहेर
धावत येऊन तुला भेटण्याची ओढ दाटून आली
तुझा मेसेज आलाच, "मी निघालीये रे..."
वाटलं कळवावं का तुला,
गर्दीत आहे, सार्यात आहे... पण एकटाच मी!
आणि नकळत, माझ्याच आतून आला गं आवाज....
"मी आहे रे, मी आहे!!"
No comments:
Post a Comment